हा ब्लॉग शोधा
आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष
Sumit Ravi Sarwade.
B.Com,D.T.Ed,
Retail Management.
sarwadesumit77@gmail.com
9552443310.
चांदबिबीचा महाल मूळचा सलाबतखानाचा!
चांदबिबीचा महाल मूळचा सलाबतखानाचा!
सलाबतखान हा निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह याचा मंत्री होता. त्याचे मूळ नाव शाह कुली. सलाबतखान ही निजामाने त्याला दिलेली पदवी. त्याने १५८० मध्ये हा तीन मजली महाल बांधला. अहमदनगर शहरात खापरी नळातून यानेच पाणी आणले.
अहमदनगर ही निजामशाहीची राजधानी. नगर हा पठारी प्रदेश. लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा. त्यामुळे येथे राजधानी उभारण्यात आली. शहराच्या संरक्षणासाठी आजूबाजूला अनेक बांधकामे उभारण्यात आली. त्यातीलच एक म्हणजे हा महाल असे मानण्यात येते. हा महाल अशा ठिकाणी आहे, की जेथून अहमदनगरकडे चाल करून येणारी फौज सहज दिसू शकते. या महालाचे दुसरे नाव दुर्बिण महाल असेही आहे, हे येथे लक्षात घेण्याजोगे आहे.
काहींच्या मते ही सलाबतखानाची आराम फर्मावण्याची जागा होती. दौलताबाद हा सलाबतखानाचा आवडता किल्ला. त्याचे सतत दर्शन व्हावे या हेतूने या महालाची उंची वाढविण्याचा त्याचा इरादा होता. पण तत्पूर्वीच (१६१९?) त्याचे तळेगाव-दाभाडे येथे निधन झाले. मोगल परंपरेनुसार या महालात, तळघरामध्ये सलाबतखानाने आपल्या कबरीची व्यवस्था आधीच केली होती. त्याप्रमाणे तेथे तो व त्याची पत्नी चीरनिद्रा घेत आहेत. त्या दोघांच्या कबरी तेथे आहेत. शिवाय तळघरातच, जरा बाहेरच्या बाजूला त्याची दुसरी पत्नी, मुलगा आणि एका कुत्र्याची कबर आहे.
असे असताना या महालाला चांदबिबीचे नाव चिकटले, ही इतिहासातील एक मौजच आहे.
वास्तविक चांदबिबी आणि या महालाचा काहीही संबंध नाही. ही निजामशहाची मुलगी. सलाबतखान आणि तिच्या भेटीचे पुरावे नाहीत. तिच्या कर्तृत्त्वाचा काळ १५८५ नंतरचा मानला जातो. या महालाचे बांधकाम या काळात पूर्ण झाले होते.
इतिहास असा असला, तरी आजही सलाबतखानाचे हे स्मारक चांदबिबीच्या नावानेच ओळखले जात आहे.
Sumit Ravi Sarwade.
B.Com,D.T.Ed,
Retail Management.
sarwadesumit77@gmail.com
9552443310.
खंडोबाची मूळकथा
खंडोबाची मूळकथा
वाचा सकाळच्या सप्तरंग पुरवणीतील प्रा. विश्वनाथ शिंदे यांचा लेख - खंडेरायाच्या शोधात
या लेखाची लिंक सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे वाचकांच्या सोयीसाठी तो संपूर्ण लेख येथे साभार सादर करीत आहे... वाचा...
बळिराजाच्या हाताखाली क्षेत्ररक्षण करण्याची जबाबदारी पार पाडणारे जे अधिकारी होते, त्यांपैकी खंडोबा हा क्षेत्रपती होता, असे प्रतिपादन महात्मा जोतिराव फुले यांनी त्यांच्या "गुलामगिरी' या इ.स. १८७३ मध्ये लिहिलेल्या ग्रंथात केले आहे. पुराणकथांमध्ये शंभर टक्के ऐतिहासिक सत्य नसते, ही गोष्ट खरी असली तरी खंडोबा ही इतिहासकाळातील पराक्रमी व्यक्ती होती, या ऐतिहासिक सत्याकडे महात्मा फुल्यांनी वाचकांचे लक्ष वेधले, ही फार महत्त्वाची बाब आहे. या ऐतिहासिक वीरपुरुषाला कालांतराने जनमानसाने कृतज्ञतेने देवतास्वरूप दिले. देवतास्वरूप प्राप्त झाल्यानंतर खंडोबा लोकदैवताच्या स्वरूपात सर्वत्र पुजला जाऊ लागला.
आंध्र-तेलंगणापासून कर्नाटक-महाराष्ट्राच्या विशाल भूप्रदेशावर अधिराज्य गाजविणाऱ्या खंडेरायाच्या ऐतिहासिक चरित्रावर काळाच्या प्रवाहात कल्पनेची अनेक पुटे चढत राहिली आणि खंडेरायाचा मूळ इतिहास दृष्टीआड होत गेला.
उपरोक्त ग्रंथात म. फुल्यांनी मांडलेले मत "प्रचाराच्या अभिनिवेशातून उद्भवलेले आहे,' असे प्रतिपादन प्रख्यात संस्कृती-अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी केले. पुढे अन्य अभ्यासकांनी म. फुल्यांच्या विचाराकडे दुर्लक्ष केले आणि ते डॉ. ढेरे यांच्या मार्गानेच गेले. घोड्यावर आरूढ झालेल्या, हाती मोठे खङ्ग धारण करणाऱ्या, स्वतःच्या पत्नीसह युद्धामध्ये दंग असणाऱ्या, सैनिकी आरभाटात मूर्तिरूपाने आपल्यासमोर साक्षात उभ्या असणाऱ्या खंडेरायाच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाकडे दुर्लक्ष करून आपणही शंकराचा अवतार मानून भक्तिभावाने त्याच्या पूजेत रंगून गेलो. खंडेरायाच्या चरित्राकडे ऐतिहासिक दृष्टीने बघणाऱ्या म. फुल्यांनी मला चकित केले आणि मी खंडेरायाच्या अभ्यासाकडे वळलो. गेली काही वर्षे मी खंडेरायाच्या मूळ रूपाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. हा शोध घेताना ऐतिहासिक पुरावे हाती लागण्यापेक्षा अडथळेच खूप आहेत, याचा मला प्रत्यय येऊ लागला. कारण संस्कृती संक्रमणात खंडेरायाचा मूळ इतिहास काळ्याकुट्ट ढगांनी झाकोळून गेला आहे.
ऐतिहासिक वीरपुरुष म्हणून आणि लोकदैवत म्हणून खंडेरायाची प्रतिमा दूषित करण्याचे पहिले काम इसवी सन १२६० ते १५४० या दरम्यान लिहिल्या गेलेल्या "मल्हारिमाहात्म्य' या संस्कृत ग्रंथाने केले. हा संस्कृत ग्रंथ इ. स. १५८५ मध्ये सिद्धपाल केसरी नामक कवीने मराठी भाषेत आणला. संस्कृत "मल्हारिमाहात्म्य' या ग्रंथाने आंध्र-तेलंगण-कर्नाटकासह महाराष्ट्रात खंडेरायाला अवताररूप बहाल केले आणि सिद्धपाल केसरीच्या मराठी ग्रंथाने तर खंडेरायाच्या शंकर अवतारावर शिक्कामोर्तबच केले. या दोन्ही ग्रंथांचा इतका प्रभाव पडला, की पुढे लोकपरंपरा-लोकसंस्कृती-वाघ्यामुरळीची गाणी, संतवाङ्मय इत्यादी सर्व लिखित सामग्री त्या ग्रंथाची "री' ओढू लागले. ही सर्व सामग्री खंडेरायाच्या चरित्राचा आणि चारित्र्याचा शोध घेताना अभ्यासकाला बुचकळ्यातच टाकू लागली.
लोकदैवताचे लौकिक रूप
"खंडोबा हा महाराष्ट्राचा कुलदेव आणि विठोबा हा इष्टदेव. अनेक कुलदेवतांना इष्टदेवतेची प्रतिष्ठा लाभते; ती प्रतिष्ठा खंडोबाला लाभली नाही,'' अशी खंत अभ्यासक व्यक्त करू लागले. ""संतांनी खंडोबाच्या उपासनेतील अनिष्टाचे निराकरण करण्यासाठी खंडोबावर आध्यात्मिक रूपके रचली. संतांचा हा प्रयत्न लोकमानसात रुजला असता- दृढावला असता, तर खंडोबा लोकधर्माच्या क्षेत्रातून अध्यात्माच्या क्षेत्रात प्रविष्ट झाला असता आणि विठोबाच्या भक्तांप्रमाणे खंडोबाच्या भक्तांची वाणी आदरणीय बनली असती,'' अशी खंत डॉ. रा. चिं. ढेरे यांसारखे अभ्यासक व्यक्त करताना दिसतात. वस्तुतः संस्कृती संक्रमणाच्या प्रचंड रेट्यापुढे मान न तुकविता खंडेरायाने स्वतःचे मूळ लोकदैवताचे लौकिक रूप अबाधित ठेवले. आपले ब्राह्मणीकरण होऊ न देता खंडेरायाने आपला लढाऊ बाणा कायम ठेवला. साऱ्या विधिविधानांमध्ये अवशेषरूपाने का असेना, थोडा फार मूळ ऐतिहासिक वारसा सांभाळून आजही खंडोबाचे अस्तित्व टिकून आहे. हा अवशेषरूपाने शिल्लक राहिलेला वारसा खंडोबाच्या चरित्राचा शोध घेताना अभ्यासकांना उपयोगी होऊ शकतो. त्यामुळे या टिकून राहिलेल्या सामग्रीबद्दल संशोधकांनी आनंद व्यक्त न करता त्याविषयी हळहळ व्यक्त करणारी ही अभ्यासकांची दृष्टी ऐतिहासिक वीरपुरुष म्हणून शोध घेताना साह्यकारी न होता, त्याच्या अवतारी रूपालाच अधिक प्राधान्य देणारी ठरते.
![]() |
| येळकोट येळकोट जयमल्हार... तळी भरण्याचा विधी. |
कन्नड भाषेतील अभ्यासक डॉ. चिदानंदमूर्ती, डॉ. श्रीनिवास रिती, डॉ. कलबुर्गी, डॉ. एम. बी. नेगिनहाळ आणि मराठीतील ल. रा. पांगारकर, त्र्यं. गं. धनेश्वर, डॉ. माणिकराव धनपलवार, श्री. पांडुरंग देसाई यांचा अपवाद वगळता अन्य अभ्यासकांनी खंडेरायाला दैवतरूप प्राप्त झाल्यानंतर जे घडले त्याचाच शोध घेण्यावर अधिक भर दिला. खंडेरायाच्या अवतार कल्पनेवर लिहिण्यात त्यांनी आनंद मानला. त्यामुळे ऐतिहासिक वीरपुरुष म्हणून खंडेरायाच्या चरित्रावर फारसा प्रकाश पडू शकला नाही.
महाराष्ट्रात खंडेरायाला खंडोबा, मल्हारी, म्हाळसाकांत, मार्तंड, मल्हारीमार्तंड अशी अनेक नावे आहेत. मल्लुखान, अजमतखान अशा नावांनी संबोधून मुस्लिम समाजातील लोकही खंडेरायाला भजतात. जेजुरी हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध खंडोबा क्षेत्र असले तरी पाली, नळदुर्ग, नेवासे, बीड, सातारे (औरंगाबाद), माळेगाव, निमगाव, बाळे (सोलापूर) या प्रसिद्ध ठाण्यांबरोबरच सुमारे २५० हून अधिक खंडोबाची ठाणी महाराष्ट्रात आहेत. एकट्या फलटणमध्ये खंडेरायाची वेगवेगळ्या काळातील पाच मंदिरे आहेत. ब्राह्मणांपासून सर्व पूर्वास्पृश्य जाती, आदिवासी जमातींमधील लोक खंडोबाचे भक्त आहेत.
खऱ्या अर्थाने खंडेराया बहुजनसमाजाचा लोकदेव आहे. म्हाळसा आणि बानू या खंडेरायाच्या दोन बायका. म्हाळसा वाण्याची, तर बानू धनगराची. याशिवाय फुलाई माळीण, रंभाई शिंपीण, चंदाई बागवानीण अशा एकूण पाच बायका खंडोबास होत्या, असा निर्देश वाघ्यामुरळीच्या गाण्यांमध्ये येतो.
खंडोबा मूळचा आंध्र प्रदेशातला. आंध्र तेलंगणात तो मल्लणा-मल्लिकार्जुन नावाने ओळखला जातो. आंध्रात केतम्मा आणि मेडलम्मा अशा दोन बायका त्याला असून, त्या दोघीही गोपालक- शिकारी जमातीच्या आहेत. कोमरवेल्ली धट्ट मल्लणा, आयरगल्ली येथील धट्ट मल्लणा, वरंगळ येथील कट्ट मल्लणा पेदिपाड (नल्लूर), पेनुगोंडे (अनंतपूर), मल्लालपत्रन ही आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिरे आहेत. हैदराबाद येथे मुळात मुस्लिम समाजाचा असलेला मल्लणा, नंतर वरंगळ येथे निघून गेल्याचे सांगितले जाते. याशिवाय ओदिल्ला-गणेशपुरी अशा सतरा-अठरा ठिकाणी खंडोबाची भव्य मंदिरे आहेत.
ऐतिहासिक लढवय्या
महाराष्ट्र-आंध्र तेलंगणाप्रमाणेच खंडेरायाची अनेक मंदिरे कर्नाटकात आहेत. कर्नाटकात मैलार, मल्लया, मैलारलिंगेश्वर, राऊतराय, मैलारखंडोबा अशा नावांनी खंडोबा ओळखला जातो. हिरे मैलार, देवरगुड्ड, यातगिरी, देवरहिप्परगी, मंगसुळी, प्रेमपूर, देवी होसूर शिग्गेहळी, देवरपट्टणम्, धारवाड या ठिकाणी खंडोबाची मंदिरे असून, कर्नाटकात खंडेरायाचे लाखो भक्त आहेत. गंगीमाळव्वा आणि कुरबत्यव्वा अशा दोन बायकांसह मल्लया कर्नाटकात नांदतो आहे. गंगीमाळव्वा उच्च जातीमधली असून, कुरबत्यव्वा कुरबा जातीची आहे. कुरबत्यव्वास, तुप्पदमाळव्वा आणि तुरगबाली अशीही नावे असलेली दिसतात. हिरे मैलार येथे तर सुमारे सहा फूट उंचीची बैठी मल्लयाची मातीची मूर्ती आहे. "मण्णू मैलार' असे त्यास संबोधले जाते. गोव्यातील म्हार्दोळ येथेही खंडोबाचे मंदिर आहे.
दक्षिण भारताच्या या तीन-चार राज्यांमध्ये मैलार मल्लणा- खंडेरायाची मोठमोठी मंदिरे असून, लाखो भक्तांच्या उपस्थितीत खंडेरायाचा यात्रा-उत्सव साजरा केला जातो. चैत्र, कार्तिक, माघ, मार्गशीर्ष या महिन्यांत यात्रा भरविल्या जातात. दसरा-दिवाळी, सोमवती अमावस्या हे यात्रेचे महत्त्वाचे दिवस आहेत. यात्रेतील अनेक विधिविधानांपैकी खंडेराया आपल्या सर्व साथीदारांसह जंगलात शिकारीला जातो. आपल्या लवाजम्यासह युद्धावर जातो. शिकारा खेळणे, युद्धाचा नकली खेळ खेळणे आणि विवाह सोहळा पार पाडणे, या गोष्टींना यात्रेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असते. या वेळी खंडेराया घोड्यावर आरूढ असतो. तलवारी, भाला, धनुष्यबाण, मुसळ आ शस्त्रांचा वापर या वेळी केला जातो. सोबत घोडे, कुत्रे, मेंढरे यांसह शस्त्रधारी सैनिक असतात. अंगावर शस्त्रप्रहार करून रक्त काढणे, जखमांवर भंडारा टाकून जखमा बांधणे अशा क्रिया केल्या जातात. या सर्व गोष्टी खंडेरायाच्या लढाऊ व्यक्तिमत्त्वाकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या आहेत. खंडेराया मुळात एक ऐतिहासिक लढवय्या शूर वीर असल्याचे ते निदर्शक आहे. कर्नाटकात खंडोबाच्या सैन्याला "कंचवीर' अशी संज्ञा वापरली जाते. डॉ. गुंथर सोन्थायमरच्या ग्रंथाचे नावच मुळी "किंग ऑप हंटर्स, वॉरिअर्स अँड शेफर्ड' असे आहे. हे ग्रंथनाम खंडेरायाच्या ऐतिहासिक लढवय्या वीर असलेल्या बाबीवर शिक्कामोर्तब करणारे आहे. मुळात लढवय्या वीर असणाऱ्या व्यक्तीला आदरापोटी लोकांनी देव मानले आणि कालांतराने शंकराच्या तारकथा खंडेरायाशी जोडल्या गेल्या. या अवतारात इतक्या प्रभावी ठरल्या, की लोकांना मैलार- मल्लाणा खंडेरायाच्या मूळ स्वरूपाचे विस्मरण झाले.
पंथपरंपरा
पूर्वजपूजेची प्रथा सर्व भारतभर प्राचीन काळापासून रूढ आहे. पूर्वजाच्या मृत्यूनंतर त्याला देव्हाऱ्यावर पुजले जाते. कोणी ही पूजा मुखवट्याच्या स्वरूपात करतात, तर कोणी सोन्याचांदीचे "टाक' तयार करून पूजा करतात आणि आपल्या पूर्वजांची स्मृती जपतात. तसेच पूर्वजांच्या मृत्यूनंतर थडगे बांधतात, त्यावर पादचिन्ह अगर लिंगप्रतिमा कोरतात. काही ठिकाणी वीरगळीच्या स्वरूपात पूजा केली जाते. आज जरी खंडोबाच्या मंदिरात वेगवेगळ्या स्वरूपाच्या मूर्ती आढळत असल्या, तरी प्रत्येक मंदिरात लिंगप्रतिमा आहेत. कर्नाटकातील देवराहिप्परगी, कारमनी या ठिकाणी खंडोबाचे पितळी "टाक' आहेत. जेजुरीलाही "टाक' आहेत. या संदर्भात डॉ. रा. चिं. ढेरे लिहितात, ""वीरपुरुषाचे दैवतीकरण होणे शक्य आहे. भारतीय देवता-संभारात अशा अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध देवता आहेत, की ज्या मूलतः मनुष्यरूपाने इतिहासावर ठसा उमटवून गाजल्या आहेत. प्रत्यक्ष कर्नाटकातच "वीरगळ' नामक अनेक स्मृती-शिला स्थानिक वीरांच्या स्मरणार्थ पूजिल्या जातात. देवता-विज्ञानातील या विवक्षित प्रक्रियेप्रमाणे खंडोबाची निर्मिती झाली असणे शक्य नाही.''
याच संदर्भात एक तरुण संशोधक डॉ. नीरज साळुंखे आपल्या "दैत्यबळी व कुंतलदेश महाराष्ट्र' या ग्रंथात लिहितात, ""राष्ट्रकुटांच्या दख्खनवर सत्ता प्रस्थापित झाल्यावर कर्नाटकमध्ये योद्ध्यांच्या स्मरणार्थ वीरगळ उभारण्याच्या प्रथेस महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसते. गदग-बेटगेरी, रोन, अन्निगेरी, बेन्टूर, सिरूरजा, यल्लीसिरूर इत्यादी उत्तर कर्नाटकातील स्थलांतर राष्ट्रकुटांचे वैविध्यपूर्ण वीरगळ मिळालेले आहेत. यातील गदग-बेटगिरी या धारवाड जिल्ह्यातील स्थळी सोळा वीरगळ सापडले आहेत. ज्या स्थळी हे वीरगळ सापडलेले आहेत, त्यास "मल्लरायण कट्टे' असे म्हटले जाते. ही बाब ध्यानात घेता खंडोबा मुळात शूर वीर होता, त्याच्या मृत्यूनंतर त्याला देवत्व देऊन लिंग, टाक, वीरगळ स्वरूपात त्याची पूजा सुरू झाली.
माणिक धनपालवार लिहितात, ""श्रेष्ठ नायकाच्या मृत्यूस्थळी समाधी बांधून लिंगस्थापना करतात किंवा वीरगळ उभारतात. मैलार हा देव मूलतः लिंगरूपात होता. एकदा लिंगस्थापना झाली, की भक्त पूजाअर्चा करतात. माहात्म्यपर स्तोत्रे, पदे रचली जातात, प्रतिवर्षी जत्रा भरते, त्या दैवतांची प्रसिद्धी उत्तरोत्तर वाढत जाते आणि हळूहळू एक पंथपरंपरा मूळ धरू लागते.''
मूळ आंध्र तेलंगणातील मल्लणा गोल्ला गवळी लोकांचा शूर वीर-नायक-पराक्रमी वीर होता. आंध्रातून प्रथम बिदरजवळील प्रेमपूर येथे आला आणि तिथे स्थिरावला. जेजुरी ही खंडेरायाची राजधानी आहे असे महाराष्ट्रातील भक्त मानत असले, तरी प्रेमपूर हेच त्याचे मूलस्थान आहे अशी भक्तांची दृढ धारणा आहे. बिदरजवळच्या प्रेमपुरात गेल्यावर तेथील मंदिराच्या विशाल परिसरात विखुरलेले उद्ध्वस्त अवशेष पाहिले असता, या मंदिराच्या गतवैभवाच्या अनेक खाणाखुणा दिसू लागतात. आंध्रातील अयरअल्ली मंदिरातील चौसष्ट खांबांचा भव्य दगडी नृत्यमंडप पाहून एके काळी तेथे चालणाऱ्या (वाघ्यामुरळी) ओग्गया मुरुळीच्या नृत्यसाधनेची प्रचिती येते.
अवतारकल्पनेवर कठोर प्रहार करणारे महात्मा फुले खंडेरायाकडे शंकराचा अवतार म्हणून बघणे शक्यच नव्हते. खंडेराया इतिहासकाळातील पराक्रमी व्यक्तिमत्त्व होते ते सांगताना म. फुले यांच्या सत्यशोधक, संशोधक दृष्टीचा प्रत्यय येतो. भोळेभाबडे श्रद्धाशील भक्त खंडेरायाकडे कोणत्याही दृष्टीने पाहोत; पण संशोधक अभ्यासकांनी खंडोबाकडे कसे बघावे, हे सांगणारे फुले अभिनिवेशी निश्चितच नव्हते, याचा अनुभव खंडेरायाचा अभ्यास करताना येतो.
Sumit Ravi Sarwade.
B.Com,D.T.Ed,
Retail Management.
sarwadesumit77@gmail.com
9552443310.
दाशराज्ञ युद्ध
दाशराज्ञ युद्ध
त्यातील एक म्हणजे पांडव-कौरवांतील महायुद्ध आणि दुसरे म्हणजे ऋग्वेदकालीन दाशराज्ञ युद्ध.
दाशराज्ञ युद्ध ही ऋग्वेदातील एक महत्त्वाची घटना आहे. हे युद्ध नेमके कधी झाले, हे सांगणे अवघड आहे कारण अद्याप ऋग्वेदाचा काळ निश्चित झालेला नाही. त्याबद्दल विद्वानांत मतभेद आहेत. मात्र सर्वसाधारणतः इसवी सन पूर्व दोन हजार ते इसवी सन पूर्व एक हजार चारशे हा ऋग्वेदाचा काळ मानला जातो. या कालखंडात केव्हातरी हे युद्ध झाले. या युद्धास कारणीभूत ठरले ते दोन पुरोहितांमधील वैर. वसिष्ठ आणि विश्वामित्र हे ते दोन पुरोहित. भरतांच्या कुशिकांच्या कुळात सुदास नावाचा राजा होता. विश्वामित्र हा या राजाचा पुरोहित. ऋग्वेदातील ऋचांवरून भरतांची टोळी इराणच्या पूर्व भागातून भारतीय उपखंडात शिरली असे दिसते.
विपाश (बियास) आणि शतुद्रि (सतलज) या दोन नद्यांच्या खो-यांतील जमातींचा पराभव करण्यास विश्वामित्राने सुदास राजाला मदत केली. पण नंतर सुदासाने विश्वामित्रास मुख्य पुरोहितपदावरून काढून टाकले आणि त्याच्याजागी वसिष्ठाची नियुक्ती केली. झाले! त्यामुळे विश्वामित्र चिडला. वसिष्ठ आणि त्याच्यात वैमनस्य निर्माण झाले. सुदास राजाला धडा शिकविण्याचा निश्चय विश्वामित्राने केला. (येथे चाणक्याची आठवण येते ना?) त्याने भरतांच्या विरोधात दहा जमातींच्या राजांचा एक गट तयार केला. पुरु, अनु, द्रुह्यु, यदु, तुर्वश, पख्त (पक्थ), भालाणस (भलानस), आलिन (अलिन), विषाणिन् (विशाणिन) आणि शिव या त्या दहा जमाती. यातील पुरु, अनु, द्रुह्यु, यदु आणि तुर्वश या जमाती पंचजन म्हणून ओळखल्या जातात.
हे पंचजन हे काय प्रकरण आहे ते प्रथम पाहूया.
सप्तसिंधुच्या प्रदेशात (म्हणजेच पश्चिमेकडे सिंधु आणि पूर्वेकडे सरस्वती या प्रदेशात सात नद्या वाहात होत्या. त्या अशा -
१. सरस्वती (भारतातील घग्गर, पाकिस्तानातील हाक्रा)
२. सिंधु
३. परुष्णी (रावी)
४. असिक्नि (चिनाब)
५. शतुद्रि (सतलज)
६. वितस्ता (झेलम)
७. विपाशा (बिआस)
तर या सात नद्यांच्या परिसरात वसलेल्या आर्यांच्या दोन शाखा होत्या. पहिली सूर्यवंशी इक्ष्वाकू आणि दुसरी चांद्रवंशीय ऐल. या ऐलांच्या पुरु, अनु, द्रुह्यु, यदु व तुर्वश अशा पाच जमाती होत्या. त्यांना पंचजन म्हणत. या शेतकरी जमाती असाव्यात. पंचकृष्टयः किंवा पंचकार्षणः असा त्यांचा उल्लेख आढळतो. याशिवायही तेथे काही छोट्या टोळ्या होत्या. त्या सर्वांत पुरु ही जमात बलाढ्य आणि प्रबळ होती.
अनु. द्रुह्यु, यदु आणि तुर्वश या जमाती पुरु आणि भरतांच्या आधी भारतात आल्या होत्या. अनु, द्रुह्यु आणि तुर्वश यांची चिनाब (असिक्नि) आणि रावी (परुष्णी)च्या प्रदेशात वस्ती होती. अनु आणि द्रुह्यु हे समुद्रापारच्या प्रदेशातून आल्याचे उल्लेख आहेत. त्यांनी त्यांचे देवही बरोबर आणले होते. त्यांना अ-वैदिक समजले जाई. या पंचजनांपैकी यदु आणि तुर्वशांचे आर्यांशी वैर होते. त्यांच्या नावावरूनही याला पुष्टी मिळते. अनु म्हणजे अनार्य, द्रुह्यु म्हणजे द्रोही, तुर्वश म्हणजे हल्लेखोर. ऋग्वेदात यदु आणि तुर्वश यांचा उल्लेख दास असाही केलेला आहे. महाभारताने त्यांना यवन (परकीय) म्हटलेले आहे, तर अनुंच्या पुत्रांचा उल्लेख म्लेंच्छ असा केला आहे. उत्तर वैदिक वाङमयातही यदु आणि अनु-द्रुह्यु यांना म्लेंच्छ म्हटले आहे. द्रुह्युंनी भारताबाहेर जाऊन म्लेंच्छांचे साम्राज्य स्थापन केले असे पुराणात सांगितले आहे. अर्थात त्या काळी म्लेंच्छ याचा अर्थ होता - संस्कृत नीट न बोलता येणारा. यदु ही पंचजनांतील महत्त्वाची जमात. दाशराज्ञ युद्ध काळात तिरींदर हा त्यांचा म्होरक्या होता. परसौ असा त्याचा उल्लेख येतो. त्यावरून तो पार्स देशातला म्हणजे पर्शिया (इराण) मधील असावा असा तर्क आहे. यदुंची वस्ती सिंधु नदीच्या खालच्या खो-यात होती आणि तेथून ते गुजराजमध्ये शिरले.
दाशराज्ञ युद्धात पख्तु (वा पक्थ) जमातीने भाग घेतला होता. पख्तु म्हणजे हल्लीचे पख्तून. ते वायव्य सरहद्द प्रांतात आणि त्या लगतच्या अफगाणिस्तानच्या प्रदेशात राहात असत. त्यांच्या दक्षिणेस काबुलिस्तानमध्ये भालाणस आणि ईशान्य अफगाणिस्तानमध्ये आलिन यांची वस्ती होती. विषाणिन् (शिंगे असणारा पशू - बहुधा वृषभ. विषाणिन् एकशिंगाचे शिरोभूषण वापरत असावेत म्हणून त्यांना हे नाव पडले. किंवा वृषभ हे या जमातीचे देवक - अर्थात टॉटेम असावे.) हे क्रुमु (कुर्रम) आणि गोमती (गोमल)च्या खो-यात राहात असत.
आता आपण परत दाशराज्ञ युद्धाकडे वळू या.
या युद्धात विश्वामित्राने दहा जमातींच्या राजांचा गट केला आणि तो सुदासच्या विरोधात उभा राहिला. सुदासच्या बाजूनेही दहा राजे होते. तत्सु, पर्शू, पृथू या त्यातील काही जमाती. यांच्यामध्ये परुष्णीच्या म्हणजेच रावी नदीच्या काठावर हरियुपिया (हडप्पा?) येथे लढाई झाली. दोन्ही बाजूंनी वीस राजे या युद्धात सहभागी झाले होते. सर्वमिळून सैनिकांची संख्या होती - सुमारे सहाशे! हे युद्ध भरतांचा मुख्य सुदास याने जिंकले. पुरुंचा पुरुकुत्स, अनु आणि द्रुह्यु नदीत बुडाले. पराभवानंतर पुरु पूर्वेकडे सरस्वती नदीच्या खो-यात आले. त्या प्रदेशाचे नाव शरण्यावत असे होते. तो प्रदेश म्हणजे हल्लीचा हरयाणा.
दाशराज्ञ युद्धानंतर यमुनेच्या तीरावर एक छोटे युद्ध झाले. त्यात सुदासाला अज, सिग्रु आणि यक्षांशी लढावे लागले. भेद हा त्यांचा पुढारी होता. या युद्धातही इंद्राने सुदासाला साह्य केले. या युद्धानंतर भरत यमुनेपर्यंत येऊन पोहोचले आणि त्यांनी सरस्वती व यमुना यांमधील प्रदेशात वस्ती केली. या भागाला ब्रह्मावर्त हे नाव पडले. हिंदु धर्माचा उगम येथे झाला.
(संदर्भ - आर्यांच्या शोधात, मधुकर केशव ढवळीकर, राजहंस प्रकाशन, आवृत्ती पहिली, मे २००८, किं. ९० रु., पान २४ ते २९)
9 comments:
It is very nice & useful information provided by you. I like to read history. Be continue with reagards.I waiting for next
Reply
Thanks & take careशान, धन्यवाद.
Reply
मयुरेशजी, या लेखातील सर्व माहिती मी आर्यांच्या शोधात या पुस्तकातून घेतलेली आहे. लेखाखाली तो संदर्भ दिलेला आहे.
- विसोबाछान उतारा विसोबा. पण सैनिकांची संख्या फक्त सहाशे कशी ? एवढ्या छोट्या टोळीच्या युद्धाचा इतिहास का जतन झाला आजवर ? महाभारतिय युद्धाचा इतिहास जतन झाला असेल कारण ते तेवढे मोठ्ठे युद्ध होते असे सांगितले जाते. (असे वाटते)
Reply
अधिक स्पष्टीकरण मिळाले तर समजुन घेण्यास मदत होईल. धन्यवाद.ऋग्वेदाचा काळ इसवी सन पूर्व दोन हजार ते इसवी सन पूर्व एक हजार चारशे मानला तर रामायण आणि महाभारत कधी घडले? ऋग्वेदानंतर की आधी? तसेच हडप्पा आणि मोहेंजेदाडो संस्कृतींचा काळ सुमारे इ.स.पूर्व २६०० वर्षांपूर्वीचा गणला जातो. समूळ सिंधू संस्कृतीचा उगम इ.स.पूर्व ५००० वर्षांपूर्वीचा असण्याची शक्यता मानली जाते.तर हे काळाचे गणित नेमके कुठे फसते आहे?
Reply
ऐलांच्या पुरु, अनु, द्रुह्यु, यदु व तुर्वश या जमातीही शेतकरी नसाव्यात. गोपालन करणार्या भटक्या जमाती असाव्यात. यदुंचे महाभारतकालीन प्रसिद्ध स्थलांतर आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेतच.
कामधेनूवरून विश्वामित्र (कौशिक राजा) आणि वसिष्ठ यांचे भांडण झाल्याची गोष्ट बहुधा रामायणात येते. हे भांडण नेमके कधी झाले? दाशराज युद्धाआधी का नंतर?
AnonymousFebruary 4, 2010 at 8:43 AMमाझ्या मते दाशराज्ञ युद्ध हे इंद्रिय प्रेरणा प्रमाण मानणारी पितृपूजक संस्कृती आणि मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो असे मानणारी वसिष्ठप्रणीत संस्कृती या दोन संस्कृती यांच्यामधील संघर्षावर कलेले रूपक आहे. अशी युद्धे अनेकदा झाली असावीत आणि त्यातील एकाचा आधार या रूपकासाठी घेतला गेला.
Reply
Sumit Ravi Sarwade.
B.Com,D.T.Ed,
Retail Management.
sarwadesumit77@gmail.com
9552443310.
येशूची कबर
येशूची कबर
येशूच्या मृत्यूची ही जी कथा आहे, तिचा अर्थ येशू सदेह स्वर्गात गेला असा होतो. पण जेरूसलेममधील ताल्पिऑट भागातील उत्खननात 28 मार्च 1980 रोजी सापडलेल्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या कबरीतील चुनखडीच्या दहा पेट्यांमध्ये (ossuaries) ज्या अस्थी मिळाल्या, त्या अन्य कुणाच्या नव्हे, तर येशू आणि त्याच्या परिवारातील लोकांच्या आहेत, असा दावा 'द लॉस्ट टॉम्ब' या माहितीपटातून करण्यात आला आहे. आता वाद आहे तो एवढाच की त्या अस्थी येशूच्याच आहेत, याला पुरावा काय?
ते पाहण्यापूर्वी 'ऑस्युरिज' हा काय प्रकार आहे ते बघू या. इसवी सन पूर्व 30 ते इसवी सन 70 या कालखंडात जेरुसलेम मध्ये अंत्यसंस्काराची एक रीत प्रचलित होती. ते लोक प्रथम मृतदेह एका कापडात गुंडाळीत. त्यानंतर खडकात खोदलेल्या खास कबरीत तो ठेवला जाई. तेथे तो मृतदेह कुजून जाई. त्याच्या केवळ अस्थी उरल्या की त्या लाईमस्टोनपासून बनविलेल्या पेटीत सुरक्षित ठेवल्या जात. या पेट्यांना 'ऑस्युरिज' म्हणतात. ताल्पिऑटमध्ये तशा दहा पेट्या सापडल्या. त्यातील दोन पेट्यांवर 'जीजस सन ऑफ जोसेफ' आणि 'ज्युडा सन ऑफ जीजस' असे आरेमिक भाषेत कोरलेले आहे. दोन पेट्यांवर हिब्रुत 'मारिया' (मेरी), 'मातिया' (मॅथ्यू) असे लिहिलेले आहे, तर एका पेटीवर ग्रीकमध्ये 'मरियामेने ई मारा' (मास्टर म्हणून ओळखली जाणारी मेरी.) असे कोरलेले आहे. हे मेरी माग्दालिनचे नाव असावे. पण केवळ एवढ्यावरून ते लोक येशू ख्रिस्ताच्या परिवारातील आहेत असे मानायचे का? एकसारखी नावे अनेकांची असू शकतात. तर या आक्षेपाला उत्तर म्हणून जॅकोबोविसी यांनी संख्याशास्त्राचा आधार घेतला. टोरांटो विद्यापीठातील गणित आणि संख्याशास्त्राचे प्राध्यापक आंद्रे फ्युएरव्हर्जर यांनी त्या काळातील नावांमधील साम्य आणि वारंवारता यांचा संख्याशास्त्रीय अभ्यास करून सांगितले, की ती नावे येशू आणि त्याच्या परिवारातील नसण्याची शक्यता 600मध्ये एक अशी आहे. याशिवाय जॅकोबोविसी यांनी जीजस आणि मेरी माग्दालिन यांची नावं असलेल्या ऑस्युरिजमधून काही सॅम्पल्स घेऊन ती कॅनडातील ऑन्टॅरियो येथील लेकहेड विद्यापीठातील पॅलिओ-डिएनए प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून दिली. तेथे करण्यात आलेल्या मायटोकॉन्ड्रिअल डीएनए चाचणीत जीजस आणि मेरी यांची नावं असलेल्या ऑस्युरिजमधून घेण्यात आलेल्या सॅम्पल्सचा एकमेकांशी संबंध नाही. जॅकोबोविसी यांच्या मते याचाच अर्थ जीजस आणि मेरी हे पती-पत्नी असावेत असा होतो आणि 'अखेरच्या भोजन'प्रसंगी येशूच्या मांडीवर एक मूल होते असा उल्लेख जॉन यांच्या शुभवार्तेत येतो, ते मूल म्हणजेच ज्यूडाह आहे.
प्रत्येक धर्माचे दोन भाग असतात. त्यातला एक तत्त्वज्ञानात्मक, अध्यात्मिक असतो. सर्वसामान्य धार्मिक त्याच्या नादी क्वचितच लागतात. लोकांना अधिक रूची असते, ती धर्माच्या कर्मकांडात्मक भागाशी. या कर्मकांडांची उभारणी काही मिथकं, चमत्कारकथा यांच्या पायावर करण्यात आलेली असते. त्या कथा नाकारल्या की पुढचा सगळाच डोलारा कोसळून पडतो. (जो पडणे गरजेचे असते.) 'लास्ट टॉम्ब'मधून नेमकं हेच साधू शकतं. म्हणूनच अशा साहित्याला, चित्रपटांना धर्ममार्तंडांचा विरोध असतो. एकदा धर्माचं अवडंबर दूर झालं की मग त्यांच्यासाठी राहिलं काय? येथे तर एका नव्हे, दोन धर्मांचा प्रश्न आहे. ख्रिस्त्यांप्रमाणेच मुस्लिमांचीही प्रेषित संकल्पनेवर श्रद्धा आहे. फार काय कुराण आणि बायबलमधील अनेक व्यक्तिरेखाही एकच आहेत. असो.
धर्मश्रद्धा दुखावल्या म्हणून होणारी ओरड नेहमीच श्रद्धेसाठी असते असं नाही. ती बऱ्याचदा सत्तेसाठीच असते. मात्र युरोप-अमेरिकेत, जेथे ख्रिस्ती धर्म बहुमतात आहे, जेथे मूलतत्त्ववाद जोर धरू पाहात आहे, अशा देशांमध्ये धर्मश्रद्धांना आव्हान देणारे आवाज उठतात आणि तरीही त्यांना मारहाण होत नाही, त्यांच्या कार्यालयांची तोडफोड केली जात नाही, हे आपल्यासाठी काही तरी जगावेगळंच आहे.... चमत्कारसदृश!
(सकाळमधील विश्ववेध या सदरात प्रसिद्ध झालेला लेख. 6 मार्च 2007)
10 comments:
thank got finally you came back. will visit regularly.
Reply
http://hasya-vyang.blogspot.com/
विसोबा,
Reply
तब्बल एक वर्षानंतर दर्शन दिलंत. असो.
जोरदार पुनरागमन... यापुढे असेच लिहीते रहावे ही विनंती!बर्याचदा अधुन मधुन येउन चेक करत असे. परत आलात लिहते झालात याबद्दल धन्यवाद.
ReplySP, sandy, इनोबा आणि प्रसाद,
Reply
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
यापुढे किमान नियमितता पाळण्याचे योजले आहे. बघु या, किती जमते ते.
पुन्हा एकदा धन्यवाद.
आणि सॅंडीजी,
हास्यव्यंग मोठं बहारदार आहे. मजा आली वाचताना.विसोबा,
Reply
आपली माहिती आवडली. आणखी येऊ द्या.ह्याच संदर्भातील काही वीडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत, जे अर्थातच फार रोचक आहेत. ते पूर्वीच पाहिले होते फार, त्यामुळे गोंधळ झाला की हे नव्याने काय म्हणून. पण तळटीपेने खुलासा झाला. नवीन येऊद्यात. वाट पाहतोय!
Reply
itihaas ranjak aahe. sagalyaa post vachalyaa. tai maharaj prakaran kaay aahe he kalaal.
Reply
..................
Zakasrao :)
http://jwalant-hindutw.blogspot.com/2010/03/blog-post_28.html
Reply
Sumit Ravi Sarwade.
B.Com,D.T.Ed,
Retail Management.
sarwadesumit77@gmail.com
9552443310.
ताईमहाराज प्रकरण व टिळकांवरील बलात्काराचा (खोटा) आरोप
ताईमहाराज प्रकरण व टिळकांवरील बलात्काराचा (खोटा) आरोप
आता हे सर्व असे असल्याने होते काय, की एखाद्याची बदनामी करायची म्हटल्यावर त्याच्या कामजीवनाबाबत नसत्या गप्पा पसरवायच्या, की झाले काम सोपे, हे आपण अनुभवाने शिकलेलो आहोत. व आपण एक समाज म्हणून अशा बाबतीत चांगलीच महारत मिळविलेली आहे, हे इतिहासात जाऊन पाहिले की लख्खपणे लक्षात येते. 'गीतारहस्य'कार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासारख्या थोर माणसालाही असले किटाळ सहन करावे लागले होते. त्यांच्यावर चक्क बलात्काराचा आरोप झाला होता, अगदी न्यायालयात झाला होता आणि तो अर्थातच साफ खोटा होता.
लोकमान्यांच्या आयुष्यात त्यांना मनःस्ताप देणारी अनेक प्रकरणे येतात. ताईमहाराज प्रकरण हे त्यातलेच एक. याच खटल्यात त्यांच्यावर हा बलात्काराचा आरोप झाला होता. त्यात जाण्यापूर्वी हे ताईमहाराज प्रकरण काय होते ते थोडक्यात पाहू या...
लोकमान्य टिळकांचे एक स्नेही होते वासुदेव हरी ऊर्फ बाबामहाराज पंडित. हे पुण्यात राहात असत. त्यांना मुंबई सरकारने पहिल्या वर्गाचे सरदार म्हणून मान्यता दिलेली होती. ही आसामी चांगलीच श्रीमंत होती. पुणे, बेळगाव, सोलापूर या जिल्ह्यांत, तसेच कोल्हापूर संस्थानात त्यांच्या मालकीची मालमत्ता, जमीनजुमला विखुरलेला होता. पहिल्या पत्नीच्या अकाली निधनानंतर बाबामहाराजांनी सिन्नरकर नावाच्या एका पुस्तकविक्रेत्याच्या रुपवान मुलीशी लग्न केले. त्यांचे नाव सकवारबाई ऊर्फ ताईमहाराज. त्यांना शांताक्का नावाची मुलगी होती. 7 ऑगस्ट 1897 रोजी बाबामहाराजांचे कॉल-याने निधन झाले. तेव्हा ताईमहाराज गरोदर होत्या व त्यांना मुलगा होईल व आपल्या संपत्तीस वारस मिळेल, अशी मृत्युशय्येवर पडलेल्या बाबामहाराजांना आशा होती.
बाबामहाराज कॉल-याने आजारी पडल्याचे समजल्यावर लोकमान्य त्यांना भेटावयास गेले. त्यांनी बाबामहाराजांना मृत्युपत्र करण्याचा सल्ला दिला. आपल्यामागे आपल्या मालमत्तेची व्यवस्था पाहण्यासाठी विश्वस्त नेमणे आवश्यक आहे, असे बाबामहाराजांना वाटले. त्यांनी टिळकांना त्यासाठी गळ घातली. मित्राचे मन राखण्यासाठी टिळकांनी त्याला होकार दिला व बाबामहाराजांच्या इच्छेनुसार टिळकांप्रमाणेच बाबामहाराजांचे व्याही दादासाहेब ऊर्फ गणेश श्रीकृष्ण खापर्डे, श्रीपाद सखाराम कुंभोजकर व बळवंत मार्तंड नागपूरकर हे विश्वस्त बनले. 7 ऑगस्ट 1897 रोजी सकाळी बाबामहाराजांनी मृत्युपत्र तयार केले. त्याचा मजकूर टिळकांनीच सांगितला. त्यात म्हटले होते, "आमचे कुटुंब सौ. सकवारबाई हल्ली गरोदर आहे. तीस पुत्र न झाल्यास किंवा होऊन तो अल्पायुषी झाल्यास आमचे घराण्याचे नाव चालविण्याकरिता यथाशास्त्र जरूर लागेल तितक्या वेळेस आमचे कुटुंबाचे मांडीवर दत्तक वर लिहिलेल्या गृहस्थांच्या विचारे देऊन त्या मुलाचे वतीने तो वयात येईपर्यंत सदर पंचांनी (ट्रस्टी) स्थावर-जंगम इस्टेटीची व्यवस्था करावी."
त्यानंतर 18 जानेवारी 1898 रोजी मुलगा झाला. पण तो अल्पायुषी ठरला. त्यामुळे ताईमहाराजांनी शक्यतो आपल्या नात्यातल्या एखाद्या मुलास दत्तक घ्यावे असा विचार पुढे आला. बाबामहाराजांची मालमत्ता मोठी. बाई एकटी. तिला मुलगा नाही. तशात ती हलक्या कानाची. अशा परिस्थितीत तिच्याभोवती लोभी नातेवाईकांचे कोंडाळे न जमते तर नवलच. पण या नातेवाईकांना दूर सारून टिळक व अन्य विश्वस्तांनी, पंडित घराण्याच्या एका शाखेतील एका लहान मुलास दत्तक म्हणून निवडले. ताईमहाराजांनीही त्यास अनुकूलता दर्शविली. हा मुलगा औरंगाबादजवळच्या निघोने गावचा होता. ठरल्यानुसार ताईमहाराज आनंदाने विश्वस्तांसह तेथे गेल्या व तेथे दत्तकविधान समारंभ पार पडला.
पण पंडितांचे नातेवाईक गप्प बसणारे नव्हते. नागपूरकर हे विश्वस्त त्यांना सामील होते. त्यांनी ताईमहाराजांचे कान फुंकण्यास सुरूवात केली, की हा लहान मुलगा दत्तक घेऊन तुम्हांस काहीही फायदा होणार नाही. कारण तो सज्ञान होईपर्यंत मालमत्तेवर विश्वस्तांचे नियंत्रण राहणार. त्यापेक्षा तुम्ही जर पंडित घराण्याच्या कोल्हापूर शाखेतील बाळामहाराज यांना दत्तक घेतले, तर किमान तीस हजाराचे दागिने वगैरे त्यांच्या हाती येतील. ते ऎकून ताईमहाराजांची मती फिरली. त्यांनी बाळामहाराजांना दत्तक घेण्याची तयारी सुरू केली. त्यास कोल्हापूर दरबारचा पाठिंबाही मिळविला. पण टिळकांनी हे दत्तकविधान बेकायदेशीर असल्याने ते थोपविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी कोर्टापासून पुण्याच्या तालिमबाज पठ्ठ्यांपर्यंत सर्वांची मदत त्यांनी घेतली. पण अखेर हा दत्तकसमांरभ पुण्याऎवजी कोल्हापूरात झालाच. त्यास शाहू छत्रपती उपस्थित होते. वेदोक्त प्रकरणात टिळकांनी शाहू छत्रपती विरोधी बाजू घेतल्याने या प्रकरणात छत्रपतींनी टिळकांच्या विरोधी भूमिका घेतली, एवढाच याचा अर्थ.
या दत्तकविधानाविरोधात टिळकांनी 23 सप्टेंबर 1901 रोजी पुण्याच्या प्रथमवर्ग सबजज्जांच्या न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला. वास्तविक या खटल्यात टिळकांची बाजू अतिशय कमकुवत होती आणि त्याचे एकमेव कारण हेच होते, की न्यायाधीशापासून सरकारपर्यंत सगळेच त्यांच्याविरोधात होते. या न्यायाधीश अस्टनने तर, खोटी साक्ष देणे, बनावट दस्तऎवज व खोटा पुरावा तयार करून फसवणूक करणे, बेकायदा जमाव जमवून दंगल करणे वगैरे टिळकांवरील गंभीर आरोपांबाबत पोलिस चौकशी करून त्यांच्यावर खटला भरावा अशी जोरदार शिफारस सरकारला केली. त्यानुसार टिळकांवर फौजदारी खटला भरण्यात आला आणि त्यात 24 ऑगस्ट 1903 रोजी टिळकांना दीड वर्षांची सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. त्याविरोधात अर्थातच टिळक अपिलात गेले आणि अखरे मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. नंतर दिवाणी खटल्यातही टिळकांच्याच बाजूने निकाल लागला. 31 जुलै 1906 रोजी जव्हेरीलाल ठाकोर या न्यायाधीशाने टिळकांच्या बाजूने निकाल दिला. त्यावरोधात विरोधी पक्षाने उच्च न्यायलयात अपिल केले. त्यात टिळक हरले. मग ते प्रीव्ही कौन्सिलमध्ये गेले व तेथे जिंकले. बाबामहाराज पंडितांच्या मालमत्तेच्या रक्षणासाठी या खटल्यांच्या पायी टिळकांना कर्जबाजारी व्हावे लागले.
तर टिळकांवरील या फौजदारी खटल्यात पुरावा म्हणून एक पत्र सादर करण्यात आले होते. ''औरंगाबाद येथील मुक्कामात टिळकांनी ताईमहाराजांवर बलात्कार केला" असा आरोप त्या पत्रात करण्यात आला होता. विशेष म्हणजे खुद्द ताईमहाराज आणि त्याची ब्राह्मण सेविका गोदूबाई यांनी न्यायालयात तसे सूचित व्हावे अशा त-हेने साक्ष दिली होती. टिळक-चरित्रकार तात्यासाहेब केळकर सांगतात, "या जबान्या झाल्या त्या दिवशी कोर्टातून घरी आल्यावर टिळक रागाने लाल झाले होते की तसे लाल झालेले एरवी कोणी केव्हा पाहिले नव्हते. ते इतकेच म्हणाले की 'एखादी बाजारबसवी स्त्रीदेखील आपली बेअब्रू आपल्या तोंडाने कबूल करीत नाही, झाकून ठेवते पण एवढ्या मोठ्या सरदार घराण्यातील ही स्त्री निष्कारण आपली बेअब्रू आपल्या तोंडाने खोटे बोलून दाखविते तेव्हा तिचा धिक्कार असो.'" (पृ. 151)
टिळकांनी बलात्कार केल्याची ताईमहाराजांनी दिलेली साक्ष खोटीच होती. त्यांचे पत्रही बनावट होते. हे न्यायालयात सिद्धही झाले. ही पंडितमहाराज आणि नागपूरकर यांनी खेळलेली एक तेढी चाल होती, हेही लोकांच्या तेव्हा लक्षात आले.
या घाणेरड्या व खोट्या आरोपांनी टिळकांच्या चरित्रावर डाग पडावा एवढे त्यांचे चारित्र्य हलके नव्हते. यातून एकच दिसले, की समाजवंद्य माणूस लोकांच्या मनातून उतरावा यासाठी त्याचे चारित्र्यहनन करण्याची चाल विरोधक खेळतात, यातून टिळकही सुटले नव्हते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, या दृष्टीने तो काळही आजच्या पेक्षा काही फार वेगळा नव्हता.
संदर्भ -
- शाहू छत्रपती आणि लोकमान्य टिळक - य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, प्रथमावृत्ती, 1986, पृष्ठ - 102 ते 138 व 151.
24 comments:
१९०६ च्या निकालानंतरही २ कोर्टांची चढऊतार टिळकांना करावी लागली. म्हणजे विषय पूर्णपणे मिटेपर्यंत १९१० उजाडले असणारच. १८९७ ते १९१० - टिळकांच्या आयुष्यातली मोलाची १३ वर्षे बाबामहाराज आणि ताईमहाराज ह्या बिनमहत्त्वाच्या मूर्खांच्या लफ़ड्यांत वाया गेली. त्यापेक्षा ताईंचं ते पहिलंच पोर जगलं असतं, किंवा टिळक ट्रस्टी बनण्याच्या गळ घालण्यापुढे नमले नसते, तर त्या १३ वर्षांत त्यांची बहुमोल एनर्जी आणि वेळ भारताच्या आणि स्वातंत्र्याच्या सत्कारणी लागला असता!
Reply
junya bhangadi shodhun kay upyog ?
Reply
lokana sudhava tyanchya dokyat shanshayacha kida sodu naka!
deshat sagalikade hech udyog suru ahet.
AnonymousApril 23, 2008 at 1:19 AMsadoba,
Reply
bhaltech buva tumhi vinodi.
ani tumhala deshachi kiti buva kalji!
pan amchya dokyat ek sanshyacha kida alay, ki tumhala itihas kashashi khatat te mahit ahe ka? itihas ka janun ghyaycha asto tyachi janiv ahe ka? ki ugach uchalali jeebh ani lavli talyala, sadoba!
- pankaj
AnonymousApril 23, 2008 at 4:23 AMHello. This post is likeable, and your blog is very interesting, congratulations :-). I will add in my blogroll =). If possible gives a last there on my blog, it is about the Impressora e Multifuncional, I hope you enjoy. The address is http://impressora-multifuncional.blogspot.com. A hug.
Reply
AnonymousApril 24, 2008 at 8:05 AMतुमचे सर्व लेखन वाचले. अतिशय चांगले अाहे. खूप खूप लिहा. अशा लेखनाची गरज अाहे.
Reply
अभिनंदन!
हे विषय जुने झाले हे खरे पण तरीहि आपण ते व्यवस्थित मांडत आहात त्याबद्दल अभिनंदन. एखाद्या वादग्रस्त विषयावर लिहिताना एकाच पुस्तकावर विसंबून राहण्याऐवजी काही इतर संदर्भहि वाचून पहावे असे सुचवले तर राग मानू नये.
Reply15 divas zale ajun 1hi navi post nahi?
Reply
kuthe gayab zala ho visoba shetha
Lokmanya nasatya uchapatita adakale mhanun bar nahitar jati bhedacha bawata changalach miravala asata


मला एक अशी लिंक मिळाली आहे ज्यामध्ये गांधीजींच्या म्रुत्युवर प्रश्नचिन्हा उभे केले आहे.
Reply
http://hindi.webdunia.com/news/news/mpchg/0908/11/1090811009_1.htm
AnonymousApril 13, 2010 at 9:17 AMलेख चांगला आहे , पुस्तक देखील वाचण्यात आले आहे परंतु लेखकाने कुठे ही हे दिलेले नाहीए की कोल्हापुरच्या बाळ महाराजना दत्तक घ्यायला टिळकणी का विरोध केला? नात्या तलाच योग्या असा कुठेही नियम नक्कीच नाही , परत तो मुलगा ताई साहेब ह्याचा मुलगा म्हणून जगणार होता मग आईचे मन लक्षात घ्यायचे का? विश्वस्तांचे ? मित्र महत्वाचा का मायतची बायको? विश्वातनी फक्त दत्तक मूळ घेतल्या नंतर कारभारची पाहणी करणे जास्त अपेक्षित आहे ना की कोणता मुलगा घ्यायचा ह्यावरून मत प्रदर्शन करण्यात
Replyटिळकांवरील मजकूर वाचला. छान लिहिलाय...अशा लिखाणाची गरज आहे. बदनामी-तंत्र फार प्रचीन काळापासून वापरले जाते आहे हे खरेच आहे. टिळकांच्या लढाऊपणाची खरच कमाल आहे....सुबोध केंभावी
Reply
इंग्रजांच्या न्याय व्यवस्थेचेही इथे दर्शन होते. वरच्या कोर्टात टिळक क्रमाने जिंकतात व हरतात.नशीब इथे ताईमहाराजांची जात दिलेली नाही. नाही तर संभाजी ब्रिगेड सारखे दांडगे परत टिळकांची ब्राह्मण जात काढून मोडतोड करते.पवार कुटुंबातला एकजण तीन चार वर्षांपूर्वी पुण्यात आला होता.त्याचा दावा होता की तो एक दत्तक पुत्र असून ब्रिटनचा रहिवासी आहे. टिळकांच्या इतिहासाने ताईमहाराजांची दखल घेतली.पण पवारांच्या इतिहासात असे कोणी दखल घेणे असंभवनीय.ह्यावरून जातींची दहशत समजून येते.
Replyइतिहासातल्या थोर पुरुषांची बरीच शक्ती, पैसा, आणि वेळ स्वकियांशीच लढण्यात गेली हे सर्वात मोठे दुर्दैव
Reply
All the estate is with Pandit family who stays near SP college in Pune. One of the legal heir Mr Bal Pandit is cricket expert. As per my knowledge land of SP college is donated by Pandits to Shikshan Prasarak Mandali & for college building Patwardhans of Jamkhandi donated the funds. Previously Lokmanya Tilak was working with Deccan Education Society. He was not getting along with Gopal Ganesh Agarkar so he left DES & formed SPM.
ReplyThose who trust British for their so called justice should study chapters in the life of Bajirao Peshwe 2, Chatrapati Pratapsinha Maharaj, Trimbakji Dengale, Gangadharshastri Patawardhan, Fatehsingh Gaikwad, Rango Bapuji Gupte & Khushruseth Modi. British used all these people against Pratapsinha Maharaj & ultimately expelled him from Satara throne of Maratha Empire & tortured him very badly. He was such a good natured king but British arrested him & tied him with iron rope & kept him in a stable. Still we feel that British were very 'just' with natives. How they exploited India financially ? Please go thru Shashi Tharur's book on it. Marathi translation is available with the name 'Andharyug'.
ReplyRango Bapuji Gupte spent many years in England & pleaded the case of Pratapsinha Maharaj & tried to convince British Govt that there is a lot of injustice with Maharaj & wrong ways followed by Elphinston to capture Satara throne but had to return to India without any promises from British Govt. Still we trust justice given to natives by British? Surprising !!!!
Reply
Sumit Ravi Sarwade.
B.Com,D.T.Ed,
Retail Management.
sarwadesumit77@gmail.com
9552443310.
पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?
मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा' (Subah) ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...
इतर पोस्ट
-
ताईमहाराज प्रकरण व टिळकांवरील बलात्काराचा (खोटा) आरोप आपल्या संस्कृतीत काम हा पुरुषार्थ मानला गेलेला असला, तरी त्याकडे पाहण्याची आपली दृष्टी...
-
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गणोजी शिर्केच पुढे काय झालं? त्याचा मृत्यू कधी व कसा झाला? मुळात संभाजी महाराजांच्या मृत्यूला किंवा पकडण्याबा...
-
अष्टप्रधान मंडळ Primary tabs बघा (active tab) What links here हेमंत लाटकर in जनातलं, मनातलं 15 Dec 2015 - 12:01 pm शिवाजी महाराजांनी स्व...
-
हिरोजी फर्जंद – Marathisrushti Articles लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजेल ह्या काळजीमुळे प्रत्येक रयत रयतेतील प्रत्येक जण...
-
अशी आहेत इतिहासातील प्रसिद्ध, १२ मावळ ; हा इतिहास तुम्हाला माहित आहे का? सह्याद्रीच्या मुख्य रांगेला पूर्वेकडे अनेक लहान लहान शाखा फुटल्या ...
-
Sisodia The Sisodia is an Indian Rajput clan, who claim Suryavanshi lineage. A dynasty belonging to this clan ruled over the kingdom o...
-
खंडोबाची मूळकथा खंडोबा मूळचा आंध्र प्रदेशातला. आंध्र तेलंगणात तो मल्लणा-मल्लिकार्जुन नावाने ओळखला जातो. आंध्रात केतम्मा आणि मेडलम्मा अशा दोन...
-
जावळी …पूर्ण हिंदवी स्वराज्य हे केंद्र असलेले हा भाग आता अर्ध्या हुन अधिक कोयने धरणाच्या पत्रात बुडालेला आहे.जेव्हा प्रचंड दुष्काळ पडतो तें...
-
छत्रपती, दादोजी आणि रामदास – शेजवलकरांच्या नजरेतून महाराष्ट्रात मराठा-ब्राम्हण वाद राजकीय स्वार्थासाठी उभा केला गेला आणि त्याला अजूनही भडकता...
-
शिवाजीचे अष्टप्रधानमंडळ शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ भारतातील महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून ...






Wa Braech diwasani navin kahitari wachayal amilale tumachya Blog war
Replywaiting for new
लेखातली ज्ञानात भर घालणारी माहिती आवडली. एकूणच ब्लॉग आणि त्याची मध्यवर्ती कल्पनासुद्धा एकदम छान.
Replyमाणूस म्हणून जगण्यासाठी...माणुसकी नावाचं सत्य जपण्यासाठी.
हे सर्वात आवडलं.
पुन्हा एकदा सुंदर लेख. मला मलिक अंबर बद्दल जाणुन घ्यायच होत. कृपया त्याच्या जीवनावर प्रकाश टाकणारा लेख लिहा जेणेकरुन आमच्या ज्ञानात भर पडेल.
Replyधन्यवाद
We r waiting for new article...
http://khattamitha.blogspot.com/2008/02/blog-post_26.html
Replyरा. रा. वामनराव,
मलिक अंबरबद्दल थोडंस यापूर्वी लिहिलं होतं.
वर लिंक दिलीय.
अधिक काही वाचनात येताच आपणांस नक्की कळवीन.
आणि
धन्यवाद.
- विसोबा
Your blog is cool. To gain more visitors to your blog submit your posts at hi.indli.com
Replyमाहितीपूर्ण लेख
Replyमाहिती चांगलीच होती पण अष्टकोनी महाल नसून तो षटकोनी आहे.दुरूस्तीची दक्षता घ्यावी.
Replyमाहिती चांगलीच होती पण अष्टकोनी महाल नसून तो षटकोनी आहे.दुरूस्तीची दक्षता घ्यावी.
Reply