हा ब्लॉग शोधा

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

 मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा' (Subah) ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रमुख 'सुभेदार' म्हणून ओळखला जात असे. सोळाव्या शतकात मुघल शासकांनी प्रशासनाच्या सोयीसाठी आणि प्रभावी नियंत्रणासाठी सुभ्यांची विभागणी प्रशासकीय विभागात केली होती. उदा. सरकार (District- जिल्हा), परगणा (Pargana- लहान विभाग) आणि कसबा (Qasba/Mauza- छोटे खेडे).

मुघल बादशहाचा प्रतिनिधी म्हणून निजामाने दख्खनमध्ये देखील ह्याच पद्धतीचे/आकृतीबंधाचे पालन केले. हैदराबाद राज्याचा कितीतरी भाग मराठ्यांच्या किंवा इंग्रजांच्या ताब्यात गेला. तरी १८६४ पर्यंत कागदोपत्री पूर्वीचे सुभे म्हणजे प्रांत आणि सरकार म्हणजे जिल्हे यांचा उल्लेख केला जात असे.

त्याकाळी मराठवाड्याचा भाग दोन ते तीन सुभ्यात तसेच जुन्नर आणि कोकण हे भाग औरंगाबाद सुभ्यात मोडत, हे वाचून आपल्याला आश्चर्य वाटेल!

निजाम-उल-मुल्क हा दख्खनचा व्हाईसरॉय असतानाच्या काळात दख्खनमधील सुभ्यांची एकूण संख्या सहा होती.

हे सहा सुभे खालीलप्रमाणे होते.-

१. औरंगाबाद (Khusjistabunyad)

२. खानदेश (Khandesh)

३. वऱ्हाड (Berar)

४. बिदर (Muhammadabad)

५. विजापूर (Darul-Zafar)

६. हैदराबाद (Farkhundabunyad)

▪️सुभे औरंगाबादमध्ये दौलताबाद, अहमनगर, पैठण, परंडा, बीड, जालना, संगमनेर, फत्तेहाबाद धारूर, सोलापूर, जुन्नर, तळकोकण, जव्हार हे सरकार किंवा जिल्हे येत होते.

▪️सुभे खानदेशमध्ये सहा सरकार म्हणजे जिल्हे होते. यामध्ये असीरगड, बिजागडखरगोण, बागलाण, कालणा, नंदुरबार, हंडिया यांचा समावेश होता.

▪️सुभे वऱ्हाड या सुभ्यात पाथरी, मेहकर, बेनालवाडी, पाईनघाट/गाविलगड, कळंब, खेडला, नरनाळा, पूर्णा, देवगड, शिरपूर या जिल्ह्यांचा समावेश होता.

▪️सुभे बिदर या सुभ्यात बिदर, कल्याणी, मलखेड, यादगीर हे जिल्हे होते.

▪️सुभे विजापूरमध्ये गुलबर्गा, तळगाव, असदनगर, अधोनी, बंकापूर, तोरगल, रायबाग, गाजीपूर, नळदुर्ग, मुद्गल, मुस्तफाबाद, नुसरताबाद, पन्हाळा वगैरे जिल्ह्यांचा समावेश होता.

▪️सुभे हैदराबादमध्ये आंध्र आणि तामिळनाडूमधील भागांचा समावेश असे.

निजाम-उल-मुल्क आसफ जाह पहिला हा मुघल दख्खनचा तीन वेळा प्रांतीय गव्हर्नर होता. पहिल्यांदा १७१३ ते १७१५ पर्यंत, नंतर १७२० ते १७२२ पर्यंत आणि पुन्हा १७२४ ते १७४८ म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत. निजाम-उल-मुल्कच्या मृत्यूच्या वेळी मुघल दख्खनचे प्रादेशिक अधिकार क्षेत्र त्रिचीनोलीच्या किल्ल्यापर्यंत (Fort of Trichinoaly) होते आणि त्यामध्ये वर उल्लेख केलेल्या सहा सुभ्यांचा समावेश होता.

तळटीपा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

  मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा'  (Subah)  ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...

इतर पोस्ट