हा ब्लॉग शोधा

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची रचना कशी होती?

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची रचना कशी होती?

शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधानांची नेमणूक केली. या आठ प्रधानांच्या हाती राज्यकारभारातील काही अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. त्यांची रचना खालीलप्रमाणे

१. पंतप्रधान (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे. यावरुन या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन पगार मिळत असे.

२. पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र नीलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकार्‍याकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून तो तपासून महाराजांसमोर सादर करावा लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन पगार होता.

३. पंत सचिव (सुरनीस) : अण्णाजीपंत दत्तो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व जाणार्‍या येणार्‍या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते. शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकार्‍यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता.

४. मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक. यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

५. सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते. शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

६. पंत सुमंत (डबीर) : रामचंद्र त्रिंबक. हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठविणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार होता.

७. न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

८. पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : मोरेश्वर पंडित. हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणार्‍या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

महाराजांनी अष्टप्रधान पद्धति स्वीकारल्यामुळे स्वराज्याचे काम सुकर झाले. कामांची योग्य ती विभागणी करण्यात आल्यामुळे प्रत्येक मंत्र्यास आपापल्या जबाबदारीची जाणीव झाली. कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी होणार नाही असेच वर्तन त्यांच्याकडून अपेक्षित होते, त्यामुळे त्यांस दक्षता घ्यावी लागत असे. हे सर्व मंत्री आपल्या कामांसाठी महाराजांस उत्तरदायी होते.

त्याचप्रमाणे पुढील पिढीतील नियुक्त्या ह्या निष्पक्षपाती व्हाव्यात अशी महाराजांची ठाम धारणा होती. केवळ ह्या मंत्र्यांची मुले किंवा नातेवाईक यांच्यावर योग्यता नसताना पदभार सोपवणे या पक्षपाती वृत्तीला महाराजांचा परखड विरोध होता.

अष्टप्रधानांची नेमणूक -

राज्याभिषेकावेळी सिंहासनाच्या सभोवार हातांत सुवर्णकलश घेतलेले प्रधान आठ दिशांना उभे राहिले होते. पूर्वेला मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हाती सुवर्णकलश घेऊन उभे राहिले होते. दक्षिणेस सेनापती हंबीरराव मोहिते दुधाचा रौप्यकलश घेऊन उभे राहिले होते. पश्चिमेस रामचंद्र नीलकंठ पंडित अमात्य दही-दुधाने पूर्ण भरलेला तांब्याचा कलश घेऊन उभे राहिले होते, तर उत्तरेस छांदोगामात्य प्रधान रघुनाथ पंडितराव मधुपूर्ण सुवर्णकलश घेऊन उभे राहिले होते. त्यांच्या जवळ मातीच्या कुंभात समुद्राचे पाणी व महानद्यांचे पाणी भरून ठेविले होते. उपदिशांच्या ठायीं क्रमाने आग्नेयेला छत्र घेतलेले सचिव अण्णाजी दत्तो पंडित, सचिव, नैर्ॠत्येला पक्वान्‍नांची थाळी हाती घेतलेले सुमंत जनार्दन पंडित, वायव्येस चामर घेतलेले मंत्री दत्तो त्रिमलव ईशान्येला दुसरे चामर घेऊन न्यायाधीश बाळाजी पंडित उभे राहिले होते.

राज्याभिषेकावेळी अष्टप्रधानांची नेमणूक पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रिपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात यावीत, असे सांगितले.

छत्रपती संभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ :-

१. पंतप्रधान (पेशवा / पेशवे) – सुरुवातीस मोरेश्वर त्र्यंबक पिंगळे आणि नंतर निळकंठ मोरेश्वर पिंगळे

२. पंत अमात्य (मजुमदार) – रामचंद्र निळकंठ बावडेकर

३. पंत सचिव (सुरनीस / सुरवणीस) – आधी अण्णाजी दत्तो प्रभुणीकर, त्यानंतर रामचंद्र निळकंठ बावडेकर आणि शेवटी शंकराजी नारायण गाडेकर

४. मंत्री (वाकनीस / वाकेनवीस) – दत्ताजी पंत

५. सेनापती (सरनौबत) – सुरुवातीला हंबीरराव मोहिते आणि नंतर मोहोळजी घोरपडे

६. पंत सुमंत (डबीर /डंबीर) – जनार्दन पंत

७. न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) - आधी प्रल्हाद निराजी नाशिककर आणि नंतर काझी हैदराबाद

८. पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) – आधी रघुनाथ पंडितराव व नंतर मोरेश्वर पंडितराव

अष्टप्रधानांबद्दल हा श्लोक प्रचलित होता -

“प्रधान अमात्य सचिव मंत्री,
सुमंत न्यायाधिश धर्मशास्त्री,
सेनापती त्यात असे सुजाणा,
अष्टप्रधानी शिवमुख्य राणा” ।।

धन्यवाद!

: )

स्रोत -

शिवाजीचे अष्टप्रधानमंडळ - विकिपीडिया

संभाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

  मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा'  (Subah)  ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...

इतर पोस्ट