शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.
| छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले | ||
|---|---|---|
| छत्रपती | ||
| छत्रपती शिवाजी महाराज | ||
| मराठा साम्राज्य | ||
| अधिकारकाळ | जून ६, १६७४ ते एप्रिल ३, १६८० | |
| राज्याभिषेक | जून ६, १६७४ | |
| राज्यव्याप्ती | पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डोंगररांगांपासूननागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावरपर्यंत | |
| राजधानी | रायगड किल्ला | |
| पूर्ण नाव | शिवाजीराजे शहाजीराजे भोसले | |
| जन्म | फेब्रुवारी १९, १६३० | |
| शिवनेरी किल्ला, पुणे | ||
| मृत्यू | एप्रिल ३, १६८० | |
| रायगड | ||
| उत्तराधिकारी | छत्रपती संभाजीराजे भोसले | |
| वडील | शहाजीराजे भोसले | |
| आई | जिजाबाई | |
| पत्नी | सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सकवारबाई लक्ष्मीबाई सगणाबाई गुणवंतीबाई | |
| राजघराणे | भोसले | |
| राजब्रीदवाक्य | 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।' | |
| चलन | होन, शिवराई, (सुवर्ण होन, रुप्य होन??) | |
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख 'शिवशंभू' असा होतो.
सर्वसाधारणपणे शिवाजी महाराजांचा जन्म (१६३०) ते औरंगजेबाचा मृत्यू (१७०७) ह्या ७७ वर्षांच्या काळास इतिहासकार ‘शिवकाल’ असे म्हणतात.[१]
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरू आपल्या ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ (भारताचा शोध) या ग्रंथात म्हणतात : "छत्रपती शिवाजी प्रतिहल्ला करणाऱ्या हिंदूराष्ट्रवादाचे प्रतीक होते. जुन्या इतिहासातून त्यांनी प्रेरणा मिळविली. महाराज अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारे नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केले, त्यांच्यामागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि या गटास अशी चेतना दिली की या गटाशी धडका घेत मुघल साम्राज्य अखेर मोडकळीस आले. छत्रपतींचा मृत्यू १६८० मध्ये झाला तरी त्यांच्यानंतर संपूर्ण भारतावर प्रभुत्व प्रस्थापित होईपर्यंत मराठ्यांचा राज्यविस्तार होतच राहिला."
कुटुंब व बालपण
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.[२] इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन मुसलमानी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्यादरम्यान बदलली; पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली.
कौटुंबिक माहिती
- शहाजीराजे भोसले (वडील)
हे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले(व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.
- जिजाबाई (आई)
जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.
मार्गदर्शक
लोककथा आणि इतिहास ह्यांमध्ये कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यासंबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव मलठणकर यांजकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येते. जिजाबाई यांनी बाल शिवाजीमहाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले. शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूड इत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले.
पत्नी
- सईबाई निंबाळकर
- सोयराबाई मोहिते
- पुतळाबाई पालकर
- लक्ष्मीबाई विचारे
- काशीबाई जाधव
- सगणाबाई शिंदे
- गुणवंतीबाई इंगळे
- सकवारबाई गायकवाड
वंशज
मुलगे
मुली
- अंबिकाबाई महाडीक
- कमळाबाई (सकवारबाईची कन्या)
- दीपाबाई
- राजकुंवरबाई शिर्के (सगुणाबाईची मुलगी, गणोजी शिर्के यांची पत्नी)
- राणूबाई पाटकर
- सखुबाई निंबाळकर (सईबाईची मुलगी)
सुना
- संभाजीच्या पत्नी येसूबाई
- राजारामांच्या पत्नी ताराबाई (माहेरच्या मोहिते)
- जानकीबाई
- राजसबाई (पुत्र संभाजी - १६९८-१७६०)
- अंबिकाबाई (सती गेली)
- सगुणाबाई
नातवंडे
- संभाजीचा मुलगा - शाहू
- ताराबाईची राजारामाची मुले - दुसरा शिवाजी
- राजसबाईची मुले - दुसरा संभाजी
पतवंडे
- ताराबाईचा नातू रामराजा, याला शाहूने दत्तक घेतले, म्हणजे तो स्वतःचाच काका झाला.
- दुसऱ्या संभाजीचा मुलगा - द्वितीय शिवाजी (खरेतर ३रा शिवाजी) (कोल्हापूर)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा