हा ब्लॉग शोधा

खर्डा किल्ला : मराठ्यांच्या विजयी शौर्यगाथा लढाईला २२३ वर्षे पूर्ण


खर्डा किल्ला : मराठ्यांच्या विजयी शौर्यगाथा लढाईला २२३ वर्षे पूर्ण

इतिहास प्रसिद्ध खर्ड्याची लढाई ११ मार्च १७९५ रोजी सुरू झाली. मराठ्यांची अखेरची विजयी शौर्यगाथा म्हणून ओळखल्या जाणा-या या लढाईला इतिहासात महत्त्व आहे. २२३ वर्षांच्या विजयाची परंपरा असलेला ऐतिहासिक दुर्ग खर्डा नगरीत आजही प्रेरणा देत आहे.

  

संतोष थोरात

खर्डा : इतिहास प्रसिद्ध खर्ड्याची लढाई ११ मार्च १७९५ रोजी सुरू झाली. मराठ्यांची अखेरची विजयी शौर्यगाथा म्हणून ओळखल्या जाणा-या या लढाईला इतिहासात महत्त्व आहे. २२३ वर्षांच्या विजयाची परंपरा असलेला ऐतिहासिक दुर्ग खर्डा नगरीत आजही प्रेरणा देत आहे.
अनेक ऐतिहासिक पोवाडे व विस्तृत प्रमाणातील वाङ्मयातून खर्डा लढाईचे ऐतिहासिक महत्त्व विषद केले आहे. अनेक ऐतिहासिक पुस्तकांचे प्रसिद्ध लेखक व प्रसिद्ध इतिहास अभ्यासक गो. स. सरदेसाई यांच्या मराठी रियासत उत्तर विभाग-२ या पुस्तकात खर्डा येथील संग्रमाबद्दल लिहिताना ते म्हणतात, पानिपतच्या संहाराचा चटका महाराष्ट्राच्या अंत:करणात जितका ताजा आहे, तितकाच खर्ड्याचा विजय मराठ्यांच्या बाहुला आजही स्फुरण चढवितो. मराठ्यांचा या लढाईतील विजयानंतर अवघ्या सात महिन्यांतच होतकरू व या लढाईचे नेतृत्व करणारे सवाई माधवरावांचा हृदयद्रावक अंत होऊन मराठा साम्राज्याचा विनाशकाल सुरू झाल्याने तर खर्ड्याच्या विजयाला जास्तच महत्त्व प्राप्त झाले.
मराठा सत्तेचा प्रभाव दक्षिणेत वाढविण्याचे नाना फडणवीसांनी ठरवल्यानंतर पेशवा दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर आणि दुसरा रघुजी भोसले यांच्या संयुक्त फौजांनी हैदराबादच्या निजामावर आक्रमक केले व हीच लढाई खर्डा येथे झाली. मराठ्यांशी उघड्या रामटेकडी मैदानावर तोंड देण्याचे सामर्थ्य निजामाकडे नसल्याने निजामाच्या फौजांनी खर्डा किल्लाचा आश्रय घेतला. १२ मार्चपासून २७ मार्चपर्यंत तहाच्या वाटाघाटी किल्ल्यात चालू होत्या. त्या अवधीत निजामाचे हाल चालले होते. शेवटी अन्न व पाण्यावाचून सैन्यांचे भयंकर हाल होत आहेत. हे पाहून २७ मार्चला निजामाच्या सरदार मुशीरुल्मुलक आपण होऊन मराठ्यांच्या स्वाधीन झाला. पुढे निजाम-मराठ्यांत तह होऊन त्यात नवे साडेचौतीस लक्षच मुलूख मराठ्यांना देण्यात आला. त्यामुळे दौलताबादचा किल्ला व त्या भोवतालचा प्रदेश पेशव्यांना, तर व-हाडचा प्रदेश महसुलासहीत नागपूरच्या भोसल्यांना देण्यात आला. पाच कोटी रुपये थकलेल्या चौथाई व युद्ध खंडणीपोटी देण्याचे मान्य केले.

खर्डा किल्ल्याचे रूप पालटणार

खर्डा येथील ऐतिहासिक संदर्भ असलेल्या वास्तूची आता पडझड झाली आहे. भुईकोट किल्ला निंबाळकर गढी व समाधी बारा प्रतिज्योतिर्लिंग मंदिरे आदींचा समावेश ‘क’ वर्ग पर्यटन व तीर्थक्षेत्र अशा दोन्ही आराखड्यांत करण्यात आला आहे. किल्ल्याची दुरुस्ती, मजबुतीकरण, सुशोभिकरण अंतर्गत बगीचा, ध्वनी प्रकाश, परिणामाद्वारे इतिहास कथन, वाहनतळ, स्वच्छतागृह आदी कामांसाठी आठ कोटींची तरतूद असून, याद्वारे खर्डा किल्ल्याचे रूप पालटणार आहे. मराठ्यांच्या गौरवशाली, संस्मरणीय, अभिमानास्पद विजयाचा साक्षीदार असलेल्या खर्डा येथील भुईकोट किल्ला व इतर ऐतिहासिक वास्तूंचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास खर्डा प्रेरणास्थान ठरेल. 

 



क्रोर्याचे सरंजामी अवशेष!

 | Updated: 11 May 2014, 01:31:00 AM

शिवाजी महाराज ते शाहू महाराज असा छत्रपतींचा वारसा सांगणाऱ्या बऱ्याचशा महाराष्ट्रीयांच्या प्रत्यक्ष अंतर्मनात मात्र एके काळी ज्यांनी शिवरायांनाही बेजार करून सोडलं होतं, त्या वतनदाऱ्यांचे नि पाटीलक्यांचे सरंजामी अवशेष मजबूत शिल्लक असल्याचा पुरावा अहमदनगरमधील खर्डा हत्याकांडानं दिला आहे.

प्रतिमा जोशी

शिवाजी महाराज ते शाहू महाराज असा छत्रपतींचा वारसा सांगणाऱ्या बऱ्याचशा महाराष्ट्रीयांच्या प्रत्यक्ष अंतर्मनात मात्र एके काळी ज्यांनी शिवरायांनाही बेजार करून सोडलं होतं, त्या वतनदाऱ्यांचे नि पाटीलक्यांचे सरंजामी अवशेष मजबूत शिल्लक असल्याचा पुरावा अहमदनगरमधील खर्डा हत्याकांडानं दिला आहे. त्याचबरोबर राज्यघटनेने समान दर्जा दिलेला असला, तरी जातउतरंडीतील खालच्या जातींवर, भूम‌िहिनांवर या सरंजामी समूहाचं वर्चस्व कायम आहे, यावरही पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे. अन्यथा, गावातल्या सवर्णाच्या मुलीशी नाव जोडलं गेल्याच्या ‘गुन्ह्या’खाली नितीन राजू आगे या १७ वर्षांच्या कोवळ्या पोराला सलग साडेपाच-सहा तास मारझोड करून, गळ्याला फास लावून ठार मारण्याचा ‘पराक्रम’ गावातली प्रतिष्ठित कुटुंबं करत असताना उरलेलं अख्खं गाव दातखीळ बसून बघ्याच्या भूमिकेत गेलं नसतं!

खर्डा हे दहापंधरा हजार वस्तीचं गाव. अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला वसलेलं. तालुका जामखेड. पठारी शिवार पार करून गावात शिरतानाच शिवाराच्या तोंडाशी काळ्या कातीव दगडांचा भुईकोट किल्ला दिसतो. बऱ्यापैकी शाबूत. भक्कम. चारी बाजूंचे बुरूज आणि लांबरुंद तटबंदी... १७९५मध्ये मराठ्यांनी केलेल्या निजामाच्या पराभवाची साक्ष देणारा. खर्ड्याची लढाई ऐतिहासिक मानली जाते. तिथल्या फलकावर लिहिलंय की, हा मराठ्यांचा युद्धातील शेवटचा विजय!

आज जवळपास दोनशे-सव्वादोनशे वर्षांनंतर या खर्ड्याचं नाव पुन्हा एकदा काळ्या शाईनं नोंदवलं गेलंय. २८ एप्रिल रोजी नितीनची भर दिवसा हत्या झाली. किशोरवयीन मुलामुलींची प्रेमप्रकरणं ही मुलखावेगळी बाब नक्कीच नाही; वेगळं होतं ते या प्रकरणातला मुलगा दलित कुटुंबातला होता हे! या प्रकरणी राज्यभर गदारोळ झाल्यानंतर ‘हे व्यक्तिगत रागातून, प्रेमप्रकरणातून उद्भवलेलं आहे... त्याला कशापायी जातीय रंग देता?’ असा प्रचारकी प्रतिवाद करणाऱ्यांनी या हत्येचा अद्याप साधा निषेधही केलेला नाही. एरव्ही फुले-शाहू-आंबेडकर अशी जपमाळ ओढणाऱ्या कथित बहुजनवादी संघटनाही गप्प आहेत. दलित संघटनांनी जोर लावला नसता, तळ ठोकला नसता, तर अन्य अनेक प्रकरणांप्रमाणे इथेही दलित अत्याचारविरोधी कायद्याची कलमं लावली गेली असती, याची खात्री देता येत नाही.

हे फक्त खर्डा प्रकरणातच घडतं आहे असं नाही. राज्यात गेल्या काही वर्षांत बौद्ध, मातंग, ढोर, पारधी, भटक्या जमाती आणि आदिवासींवरील अत्याचारांची प्रकरणं वाढली आहेत.

‘नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस’ या संस्थेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दलित अत्याचाराची दरवर्षी सरासरी १७०० छोटीमोठी प्रकरणं दाखल होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणं, हाही अनेक गावांमध्ये गुन्हा ठरत आहे. जात‌िवाचक शिव्या, अपमान, स्त्रियांवर हात टाकणं, पाणी भरू न देणं, जमिनी बळकावणं, पिकांची नासाडी करणं, बहिष्कार घालणं, वस्त्या जाळणं इथपासून ते थेट ठारच मारून टाकण्याइतपत गंभीर गुन्ह्यांच्या इतक्या नोंदी ‘पुरोगामी’ महाराष्ट्रात होत आहेत! एकट्या अहमदनगर जिल्ह्यातच गेल्या पाचदहा वर्षांत भीषण क्रौर्याचं दर्शन घडविणारी हत्याकांडं घडली आहेत. मेहतर समाजाच्या तीन तरुणांच्या शरीराचे अनेक तुकडे केलेल्या सोनई हत्याकांडाला दीड वर्ष होत आलं, पण ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात अजून तारखा पडताहेत.

या परिस्थितीत अत्याचारग्रस्त कुटुंबाला काही लाखांचं अर्थसाह्य, फास्ट ट्रॅक कोर्टाची घोषणा, खूपच चर्चा झाली असेल तर लगोलग दोनपाच आरोपींना आत टाकणं इतक्याच उपायांवर महाराष्ट्र सरकार समाधान मानताना दिसत आहे. विशेष ग्रामसभा बोलावून सर्व जात‌िजमातीच्या लोकांत सलोखा होईल असं पाहावं, अत्याचारग्रस्तांना गावाकडून संरक्षण आणि साह्याची हमी मिळवून द्यावी असे काही उपाय ‘सरकार’ला कधी सुचतच नाहीत, तर समाजही हळहळ व्यक्त करून झाल्यावर पुन्हा आपापल्या जात‌िपातीच्या तटबंदीत शिरताना दिसतो आहे. किंबहुना पोत्यातून आडमाप जोंधळे सांडावेत तशा गेल्या दीडदोन दशकांत शिवाजी महाराज नि फुले-आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या संघटनांचं पेव फुटलंय, आणि त्यालाच समांतर जातआधारित अत्याचारांची प्रकरणंही घडत आहेत, याची संगती उघडपणं लावण्याची वेळ आली आहे. एका बाजूला शिक्षण आणि वाढत्या समाजभानामुळं पूर्वापार मागासलेल्या जातीपातींची माणसं सामाजिक न्याय मागत आहेत, तर दुसरीकडं महाराष्ट्रातल्या विशिष्ट राजकीय पक्षांच्या छत्रछायेखाली वाढत चाललेली सरंजामी दंडेली गावागावातलं सामाजिक वातावरण पार नासवून टाकते आहे. यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगणारे राजकारणी असोत की प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगणारे... या दंडेलीकडं डोळेझाक करणंच बहुधा त्यांच्या सोयीचं आहे.

नितीन आगेची खर्ड्यातली झोपडीच खूप बोलणारी आहे. गावाबाहेर बोडक्या शिवारावर चार पत्रे मारून उभं केलेलं ते खोपटं गावातल्या दगडी चौसोपी वाड्यासमोर काय नि कसा टिकाव धरणार आहे? त्याचे वडील, राजू आगे हे खडी पाडण्याचं काम करतात. मुलाला शिकवायचं, मोठं करायचं अशा निश्चयानं दिवसाचे वीसवीस तास मजुरी करणारा हा माणूस पन्नाशीतच सत्तरीचा दिसतो. सध्या त्याला भेट देणारी पुढारी नि पत्रकारांची गर्दी ओसरली की, आपल्याला याच वाड्यापुढं वाकावं लागणार आहे, याचं भान त्याच्या दुबळ्या आवाजात ठासून भरलेलं आहे. असे असंख्य राजू आगे महाराष्ट्राच्या तालुक्यागावखेड्यांत असताना राज्याच्या पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणं, ही या बड्या घराचे वासे पोकळच असल्याची खूण आहे.

खर्ड्यात राजपूत भामटे, कैकाडी व तत्सम भटक्या आणि अन्य अनुसूचित जातींची बहुसंख्या आहे, पण गावातले लोक भीतीनं फारसं बोलत नाहीत, आणि ही भीती पोलिसी ससेमिरा मागं लागण्याची नाही, तर प्रतिष्ठितांशी पंगा घेण्याचे परिणाम झेपणारे नाहीत याची जाणीव असलेली आहे. ‘मोठ्या’ लोकांना दबून असलेल्या बहुसंख्येची ही प्रातिनिधिक लोकशाही राज्याला कुठे घेऊन जाणार आहे? या प्रकरणातील संबंधित मुलीलाही तिच्या कुटुंबीयांकडूनच विशेष संरक्षणाची गरज असू शकते. काही काळानं सारं शांत झाल्यानंतर आणखी एक ऑनर किलिंग होणार नाही, याची काय खात्री द्यावी? राज्यातील एरव्ही बोलक्या असलेल्या संघटना अशा अनेक मुद्दयांबद्दल फारसं काही बोलत नाहीत, हेही बोलकं आहे.

नितीन आगेच्या हत्येनं जखमा पुन्हा ताज्या केल्या आहेत. ‘जाणते’ नेते असोत की ‘मर्द’ मराठ्यांचे प्रतिनिधी असोत... तथाकथित कोणत्याही ‘डॉक्टरां’कडे त्या बऱ्या करणारी औषधे आजघडीला तरी दिसत नाहीत. खर्ड्याच्या किल्ल्यावरचं ऐतिहासिक संदर्भात लिहिलेलं ते वाक्य, ‘हा मराठ्यांचा शेवटचा विजय’... वेगळ ्या संदर्भात मनात पुन्हा पुन्हा रणभेरी वाजल्यासारखं आदळतंय.

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपरिचित घटना कोणती की जिच्यावर अजून संशोधन बाकी आहे?


जसे जसे इतिहासात अधिक संशोधन होत जात आहे तसे महाराजांचे अनेक पैलू समोर येत आहेत.

शिवाजी महाराजांनी भक्कम स्वराज्य बांधणीसाठी आपले किल्ले अधिक मजबूत बनविले. दाण्यापाण्याची व्यवस्था ठेवली,किल्लेदार नेमले. पार ठेवण्यासाठी बुरुज बांधले.अन्नधान्याची कमतरता पडू नये म्हणून भूमिगत कोठारे तयार केली,शत्रूचा वेढा पडलाच तर निसटून जाता यावे म्हणून चोरवाटा तयार केल्या.

अलीकडे शिवाजी महाराजांचे वास्तव्य १६७७ साली मद्रासपट्टनम(आजचे चेन्नई) परिसरात होते असे पुरावे सापडले आहेत.

आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराज प्रत्येक क्षणी स्वराज्याचा विचार करायचे.स्वराज्य आणखी मजबूत कसे करता येईल असा विचार रात्रंदिवस त्यांच्या मनात असायचा.

शिवाजी महाराजांना ब्रिटिशांकडे असलेल्या ज्ञानाची त्यांना कल्पना होती आणि खुद्द ब्रिटिश लोकही शिवाजी महाराजांना सुरतेच्या दोनदा झालेल्या लुटीपासून चांगलेच ओळखत होते.ब्रिटिशांनी मद्रासमध्ये थोडेफार बस्तान बसविले असतांनाच त्यांना शिवाजी वेल्लोर आणि जिंजीवर कब्जा मिळविण्याच्या रस्त्यावर असल्याची खबर मिळाली तेव्हा मद्रासमधील जनतेमध्ये खळबळ उडाली आता मद्रास शहर लुटले जाते की काय अशी धास्ती ब्रिटिशांना वाटू लागली.

९ मे १६७७ ला ब्रिटिशांनी एक शहर सुरक्षा परिषद भरविली आणि शहराची सुरक्षा मजबूत करण्यासाठी एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

लवकरच शिवाजी महाराज शहराजवळ आले.१४ मे रोजी त्यांनी एक ब्राह्मण आणि दोन अन्य इसम ब्रिटिशांकडे संदेश घेऊन पाठविले.ब्रिटिशांनी जरा धास्तीनेच तो संदेश वाचला.त्यात महाराजांनी ब्रिटिशांकडे काही औषधी खडे आणि विषावरील उताऱ्यांची मागणी केली होती आणि त्याबद्दल पैसेही देऊ केले होते.

ब्रिटिशांना हायसे वाटले,त्यांनी अत्यंत नम्रपणे महाराजांचे पैसे नाकारले आणि भेट म्हणून त्यांची मागणी पूर्ण केली,वर त्या ब्राह्मणाचा सत्कार केला त्याला चांगले ३ यार्ड लांबीचे कापड भेट म्हणून दिले आणि काही चंदनापासून बनविलेल्या वस्तू दिल्या.

ब्रिटिशांकडे वैद्यकीय ज्ञानासोबत उत्तम प्रकारचे अभियंतेही आहेत आणि याचा उपयोग आपण स्वराज्य बळकट करण्यासाठी करून घेऊ शकतो असा विचार शिवाजी महाराजांच्या मनात होता.

महाराजांनीं त्यांच्या अभियंत्यांची मागणी करण्याकरिता २२ सप्टेंबर १६७७ या दिवशी त्यांनी आपले दोन हेर अभियंत्यांच्या मागणीचे पत्र घेऊन सेंट जॉर्ज येथील ईस्ट इंडिया कंपनीकडे पाठविले.

ईस्ट इंडिया कंपनी त्याकाळी नुकतेच कोठे बाळसे धरू लागली होती.ब्रिटिश आता मात्र शिवाजी महाराजांच्या ह्या मागणीने दचकले.ब्रिटिश मात्र आपले तंत्रज्ञान शिवाजी सारख्या बलाढ्य शत्रूला पुरवून स्वतःपुढेच संकट उभे करू इच्छित नव्हते.त्यांनी शिवाजीराजेंची मागणी विनम्रपणे नाकारली.त्यांनीही तसे पत्र शिवाजी महाराजांना पाठविले.

ब्रिटिश त्यांच्या अहवालात म्हणतात की,

'सेवेजी राजा याने २२ सप्टेंबरला त्याचे दोन हेर पाठविले आणि इंजिनिअर्स पुरविण्याची मागणी केली,आम्ही तात्काळ कार्यालयीन कारण दिले आणि त्यांच्या प्रामाणिकतेविषयी शंका उत्पन्न केली आणि विनम्रपणे त्यांची विनंती नाकारली. तुमच्या प्रशासकीय गोष्टींमध्ये आमचा हस्तक्षेप ही चुकीची गोष्ट होईल असेही सांगितले.'

जॉर्ज टाऊनमधील थंबू चेट्टी रस्त्यावर कालिकांबल मंदिर आहे.एके रात्री देवीची आरती महाराजांनी ऐकली आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी त्यांची पावले मंदिराच्या दिशेने वळाली.त्यांनी मनोभावे देवीची पूजा करून दर्शन घेतले.

फोटोस्रोत :द हिंदू

मंदिरातील कोनशिलेवर स्पष्ट अक्षरांत लिहिलेले आहे की '३ ऑक्टोबर १६७७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मंदिराला भेट दिली आणि आशीर्वाद घेतले.'

तिथे एक फ्रेम केलेले चित्रसुद्धा दृष्टीस पडते जे 'मद्रास मराठा असोसिएशन'च्या ताब्यात आहे. चित्रात शिवाजी महाराज युद्धाच्या वेशभूषेत बसलेले आहेत,देवीसमोर लीन होत देवीला कमळपुष्प अर्पण करत आहेत.

तंजावूर आणि तामिळनाडूचा काही भाग शहाजीराजे यांच्या अधिपत्याखाली होता त्यांनी तो नंतर व्यंकोजी (शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ) यांना दिला होता. शिवाजी महाराजांनी तेथे काही सैनिकी अधिकारी आणि सैन्य पाठवले होते.त्यांना तेथे मराठा राव असे संबोधण्यात येई.आजही मुंबईत काही मराठा राव आहेत जे तामिळी संस्कृती जोपासतात.यासंबंधी अधिक संशोधन होण्याची गरज आहे.

संदर्भ:

१)The Sunday Diary: When the original Shivaji came to town

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

  मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा'  (Subah)  ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...

इतर पोस्ट